एकदा केव्हातरी शांतपणे बसून विचार केला की आपण वयानुसार काय काय गोष्टी सोडल्या आणि बदल्यात काय मिळवलं ह्याचा आढावा घेता येतो. मग लक्षात येतं की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. कोकणात मामाच्या बागेतले रायआवळे दगड मारून पाडलेले नाहीत. सकाळी सकाळी मामाने दिलेला म्हशीच्या धारोष्ण दुधाचा पेला कितीतरी वर्षात ओठाला लागलेला नाही. आज्जीच्या हातचं चुलीवर केलेलं पिठलं खूप वर्षात मिळालेलं नाही. जत्रेत मिळणारी पिपाणी खूप वर्षात वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसता सोसता पुरेवाट झाली आहे.
चाळीशी बघता बघता उलटली.. जवळचं कमी दिसू लागलं.. चाळीशीचा एक नवा दागिना नाकावर चढला. समवयस्क व एकेकाळी जीवाभावाचे असलेले मित्र मैत्रिणी दूर दूर पांगले गेले. डोक्यावरील केस कमी झाले व चेहेऱ्यावर सुरकुत्या आणि कमरेचा घेर मात्र वाढला. कॉलेज किंवा शाळेतले जुने मित्र मैत्रिणी भेटल्यावर आपापल्या मुलांच्या ओळखी करून देऊ लागले. " हा मोठा यंदा दहावीला गेला आणि ही धाकटी सातवीला. " जेव्हा ही मुलं काका म्हणतात तेव्हा काळजात धस्स होतं.
वाटतं बाल्य संपलं आणि तारुण्यही ईतिहासजमा झालं. वयाचा किमान दोन त्रितियांश हिस्सा संपला. आई अजूनही म्हणते " अरे चाळीशी उलटली, आता तरी मोठ्या माणसासारखा वाग." बायकोबरोबर चालताना चुकून अभावितपणे मान वळली तर बायको म्हणते " अहो काय हे? शोभत नाही हो ह्या वयात."
सर्कशीतला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच वाऱ्यावर उडणारी कापसाची म्हातारी पकडण्यात आता चार्म राहिलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बालपणीचा सुखाचा काळ" स्वत:बरोबर कधी नेला ते कळलंच नाही.
आजी गेली, मामा गेला. आता पूर्वीसारखी कोकणात जायची ओढच राहिलेली नाही. आता त्या शाळेतल्या ट्रिप्स नाहीत, पहिल्या पावसात भिजायचा आनंद नाही. कॉलेजच्या बाहेर उभे राहून मारलेला कटिंग चहा आणि सिगारेट नाही. गल्लीबोळांतलं क्रिकेट नाही. कॉलेजचं लेक्चर बुडवून पाहिलेले पिक्चर्स नाहीत.......
त्या उडत्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली वाढतं वय तिने आपल्या पदरात टाकलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण मात्र जमिनीवरच आहोत...